उन्हाळा तापला की आंब्याचा मोसम सुरु होतो अन मग या फळाचा दरवळणारा गोड गंध आणि मधुर रस साऱ्यांचाच मोहात पडतो.
यात विविधता तरी किती?
जगप्रसिद्ध हापूस पासून तर गावरानी घोटी आंब्यापर्यंत ...केसर...लंगडा.. पायरी...लाडू...नागीण...!
मोठे मोठे बंगले, मध्यमवर्गीय घरापासून तर गरिबांच्या झोपडीपर्यंत सरसकट लोकप्रिय असणारा बैंगनपल्ली!
शेप्या, हळद्या, तेल्या, मोसंब्या, मधाळ आणि अशा विविध आंबटगोड चवीत येणारा आणि रस काढून खाण्यापेक्षा लगेच माचवून, सरळ तोंडाला लावून, साल ओरपून, घुई चोखून खाण्यात मज्जा असणारा गावरानी आंबा!
विदर्भात पूर्वी या गावरानी आंब्याचा आमराया असत. काळ बदलला आणि या आमरायाची संख्या कमी झाली. पण वडीलधारी मंडळी अजूनही सांगतात कि, विदर्भात उन्हाळ्यातला पाहूणचारच्या पंक्तीमध्ये वेगवेगळ्या चवीच्या गावरनी आंब्याचा रसाच्या चार-पाच वाट्या असत. आणि सोबत एक वाटी पाण्याची...आजकालच्या भाषेत 'फिंगर बाउल...' एका रसची चव दुसऱ्यात मिसळून जाऊ नये म्हणून!!
आणि या गावरानी आंबाच्या घुया थोड्याशा पाण्यात कुस्करून वरून चवीला जरासं मीठ-साखर टाकून केलेला 'पाणरस...' म्हणजे आजकाल आपण बंद डब्यांमधून, बाटललांमधून विकत घेतो ती फ्रुटी...तसच आपण पाणरास आणि ताक एकत्र करून वर जिऱ्याची फोडणी दिली कि होतो तो 'फजिता...!' प्रत्येक आंब्याची चव वेगळी असली तरी कुठलाही आंबा मोहात पडतोच...मग 'हापूस 'च फळांचा राजा आणि बाकीच्यांना त्याची सर येऊच शकत नाही असला अभिमान...किंवा "तो हापूस काय नुसताच गोड बैंगनपल्लीचा आंबटगोडपणा त्यात नाही " असं नावं ठेवणं!
हे हवंच कशाला..??
माणसाचंसुध्दा तसंच नाही का?
इथे व्यक्ती तितक्या प्रकृती !!पण प्रत्येकात काही ना काही गुण-दोष असणारच. एखाद्याच्या गुणांनी भारावून जावून त्याच्यावर डोळे झाकून भरवसा ठेवण जसं वाईट, तसंच एखाद्याला कुठलाच गुण नाही असं म्हणून सरसकट वाईट ठरवणंसुद्धा आयोग्यच नाही का !!
शेवटी गदिमांची क्षमा मागून आणि त्यांच्याच एका गीताचा आधार घेऊन म्हणावसं वाटतं...
"प्रत्येकाचे रुप आगळे,
प्रत्येकाचे रंग वेगळे,
कुणा म्हणावे सरस न कळे,
ज्याच्या त्याच्या गुणांस जाणा
अन करा त्यांस स्वीकार...
असे हा निसर्ग जादूगर...
असे हा निसर्ग जादूगार..."
Wow amazing.....♥️..... Mssttt lihila ahes...👍👌👌😊
ReplyDeleteChan💫
ReplyDeleteTy☺☺
ReplyDelete