सुरेश पाटोळे यांची 'चोळी' ही कादंबरी वडार समाजातील सत्य घटनांवर आधारित आहे. कादंबरीचा नायक जगन हा परिवर्तनवादी आहे. त्याची आई सीताक्का ही दारूचा व्यवसाय करते, तर वडील बापू हा खाणीवर काम करतो. जगनला शिक्षणाची आवड असून तो छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शने प्रेरित झालेला आहे. परिवर्तनवादी वाटचालीत जुन्या प्रथा-परंपरावादी भूमिकांशी लढत असतानाच त्याला, आपल्या वडार समाजातील बायका अंगात 'चोळी ' का घालत नाहीत? असा प्रश्न पडतो. इथूनच वडार समाजाला परिवर्तनाची खरी गरज असल्याचे पाहून, जगन परिवर्तनाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून करण्याचा प्रयन्त करतो. मात्र अंधश्रद्धा, अज्ञान व परंपरेवर प्रचंड भरोसा असलेला समाज त्याला परिवर्तनासाठी मदत, सहकार्य व साथही देत नाहीत.
जगतिकीकरणाच्या या युगात नऊवारी लुगडं नसणारी बाई आता सहवारी पातळ नेसते, पण वडार स्त्री मात्र एका दंतकथेमुळे अंगात चोळी घालत नाही, या अंधश्रद्धेची त्याला चीड येते. शिक्षण ही जीवन दृष्टी असून समाजाला शिक्षणाशिवाय मुक्ती मिळणार नाही, अशी त्याची स्पष्ट धारणा निर्माण होते आणि तो शिक्षणासाठी आणि समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतो. समाजातील जातीच्या पोटजाती संपवण्यासाठी जगन रात्रंदिवस प्रयत्न करतो. 'तुम्ही वडार , मी पण वडार' जात तर एकच आहे मग या पोटजाती कशाला? असे क्रांतिकारी विचार तो समाजात पेरायला सुरुवात करतो. सामाजिक परिवर्तनासाठी जगन हा अनेक परिवर्तनवादी मित्रांसोबत महाराष्ट्रात फिरत असतो. दलित पँथरचा संस्थापक असलेल्या नामदेव या मित्रासोबत जगनही विद्रोहाने पेटून उठतो. असा हा जगन विवाहानंतर आपल्या संसारात व कंत्राटदारी व्यवसायात गुरफटतो. त्याला अनिल नावाचा पहिला मुलगा होतो, त्यानंतर एक मुलगी. जगन हा आपल्या जाती-धर्माचा कोणताही विचार न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारांनी प्रेरित होतो. पुढे नेहा हि जगनची नाथ इंग्रजी माध्यमातून पदवीधर होऊन पुढे एअर होस्टेसही होते. बापूने 'सीता' हे तिला पाळण्यातलेच नाव ठेवलेले असते. कारण बापूला नेहा म्हणजे सीताक्काचा पुनर्जन्म झाल्याचे वाटत असते.जगनची पुतणी स्मिताही पायलट होते. तेव्हा नात व पुतणी विमान कसे उडवतात हे पाहण्यासाठी उतावीळ होतो. चुलत भाऊ मोहनच्या साहाय्याने तो एकदा विमान प्रवास करतो. तेव्हा मेकअप करून रुबाबदार सुटातील नेहा आणि केबिनमध्ये बसून विमान चालवणाऱ्या स्मिताला पाहून जगनच्या डोळ्यांचे पारणे फिटते. एकेकाळची बिनचोळी सीताक्का विमान चालवते असे वाटून जगनला आनंद होतो. दुसरीकडे एका दंतकथेमुळे आपली पणजी, आजी, आई चोळी घालत नव्हत्या. परिणामी त्यांना विखारी नजरा डसत होत्या. त्यांनी काय अपराध केला होता या धर्माचा??माझ्याच जातीला अशा शाप का मिळाला असावा?? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात.
देवधर्माच्या नावाखाली अंधश्रद्धेवर जगणाऱ्या वडार समाजातील वास्तव व भीषण शोकांतिका या कादंबरीत मांडली आहे.
Comments
Post a Comment