भंडाऱ्याच्या डोंगरात बसलेले एकटेच तुकोबा आठवतात. या एकांतांनं त्यांना जी जगाला, चराचराला पेरून धरण्याची ऊर्जा दिली त्याचं वर्णन काय करणार? आकाश मंडप, पृथ्वी असणं, त्यात सगळा आसमंत त्यांनी कवेत घेतलाय. आपल्यापर्यंत चालत-बोलत आलेले या महासंताचे अभंग हे केवळ त्यांच्या एकांताचे देणे नसले तरी त्या सर्व चिंतनाचा तळाशी दिसतो, जाणवतो. तो त्याचा विश्वव्यापी एकटेपणा. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म या विचाराच्या तळाशी लखाखून येतो तो मानवतेचा शुद्ध नितळ गारवा.
माणूस गर्दीत असला तरी तो एकटाच असतो. भोवती गोंगाट आणि आपणच आपल्याशी हरवून जाणं. हे हरवणं काही वेळेस मनाला विरंगगुडा देणारं असतं, तर कधी कुरतडणारं. त्यात जगण्याची ओढ असते, तसेच विरक्तीही. विरक्तीची भावना हेही एकटेपाणाच एक रुपडं असतं. सर्वसंगपरित्याग ही गोष्ट सामान्यांना झेपणारी नसते तरी विरक्तीची भावना प्रत्येकाच्या मनात एक विशिष्ट टप्यावर येत असते. संसार सवरताना फार थकून गेलेला जीव विरक्तीची मागणी करतो. त्याला एकांताची ओढ लागते.
दुपारचं एखादं निवांत गावं समोर येतं कोणीतरी पारावर बसलेलं असते एकटाच. पिंपळपानांची सळसळ, पाखरांचा हलकासा किलबिलाट. शून्यात नजर हरवून बसलेलं कोणी एकटाच. शांत असलेले गावातल्या गल्याबोळ. एकटी एकटी घरं. आंगणातला विसावा. सगळ्या घरभिंती, मंदिराचा कळस, गाभाऱ्यासह एकांतात बुडून गेलेला एकांत . अशावेळी जाणवून जातो, तो गावाचा एकटेपणा खरं म्हणजे गावं, वस्ती, तांडा, पेठ, वाडी ही एक समूहभावना असते. पण तिथे हा एकटेपणा कधी कधी निर्जन तळासारखा वास करत असतो. तिथेही येतोच कधी कधी एकांताचा आवाज.
या एकटेपणाला असणाऱ्या किंवा नसणाऱ्या रूप मानता येईल का? या एकटं होऊन बुडून जाण्यात विवेक सर्वाधिक जागृत होत असावं का? या एकटेपणातून कधी एखादा राक्षसही जन्माला येत असेल का? एकांताचा ठाव घेणे आपल्याला जमेल असं नाही म्हणवत. आपल्या मनातल्या एकांताचा शोध हा आपल्या मनातला गाभाऱ्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल मानता येईल का?
Brobr ahe👌
ReplyDeleteTy😊😊
ReplyDelete