हा काळ, जो आजकाल अनुभवत आहोत, या काळानं माणसाचं पृथ्वीवर असणं, एवढं काही महत्वाचं नाही हेच अधोरेखित केलं!असे इशारे यापूर्वीही माणसाला मिळालेले असतीलच. या जगात जे जे काही आहे ते माझ्यासाठीच आहे ही हीन वृत्ती माणसाला दिवसेंदिवस हिंस्त्र व क्रूर बनवत आहे. वेळोवेळी येणारी संकटे आणि आपत्ती यांनी गंभीर इशारे दिलेले असावेत, पण ते साफ धुडकावून लावण्याच्या तामसी वृत्तीनं माणूस अधिकच निडर नि विकृत होत आला आहे. ही पृथ्वी, इथला निसर्ग, जीव-जंतू, पशू-पक्षी नि हे अवघ चराचर, सहजीवनाच्या, सोबतीच्या मंगलमय जगण्याला आसुसलेलं असताना, माणसाने फक्त 'मी' चाच डाव टाकला. 'या पृथ्वीचा मीच मालक असा वागत राहिला. खरंतर या जगण्याच्या, जैविक शृंखलेतून माणूस वजा झाला तर, फार काही दुष्परिणाम पृथ्वीवर व्हायचे नाहीत. उलट जे होईल ते अतिशय चांगलं होईल ते इथल्या वातावरणाला अधिक समृद्ध करेल. माणसांनी जशी दोन विध्वंसक महायुद्ध घडवून आणले, तशी युद्ध जीवनसृष्टीच्या शोधात कुठेही सापडलेली नाही!' जगण्याच्या अनुकूलतेसाठी, जीव-जातीच टिकणं, नष्ट होणं हे मात्र निसर्गही मान्य करतो!
सभोवतालची झाडे वेली, वृक्षराजी, जंगल आनंदून गेलेली आहे. सृष्टी प्रफुल्लित व ताजीतवानी झाली आहे. दूरवरच्या दाट जंगलात कधी तरी दिसणारी विविधरंगी पाखरं आता शहरात सुद्धा, सुरेल आवाजात गाणं गाऊन स्वर्गीय नृत्यावर ताण छेडीत आहे. मोर आपले पाचूचे पिसारे फुलवून माणसाच्या कॉलनीत फेरफटका मारून येत आहे. नद्या, तलावे, जलाशये, तळी , पाण्याचे विविध स्त्रोत आता प्रदूषणमुक्त होण्याच्या मार्गावर अग्रेसर आहे. कारखान्याच्या काळ्या व केमिकलमिश्रित पाण्यानं काळवंडलेल्या नद्यांचे चेहरे हळूहळू उजळ होत आहे.
कुठल्याशा शहरच्या वर्दळीच्या पण, आता शांत झालेल्या रस्त्यावर, निवांतपणे हरणं बसलेली आहेत, कोणत्यातरी शहराच्या शांत वस्तीतूतन हत्ती, अस्वल व इतर प्राणी शानदार सहलीचा फेरफटका मारून येत आहे. हे सर्व जीव जनावर माणसासोबत जगण्याला अनुकूल आहे, पण माणूस मात्र एकटाच धावतो आहे. बाकी शून्य येणाऱ्या शर्यतीत! केवळ जिभेच्या चोचल्यांसाठी पशु-पक्ष्यांच्या रक्तरंजित कत्तली काही थोडा काळ थांबून आहे. या काळात त्यांची संख्या अतोनात वाढून, त्यांनी मानवी समुदायांवर हल्ला केल्याचं दिसून येत आहे. हे सुंदरसे बदल केवळ प्राणी, पक्षी सृष्टी यांच्या बाबतीतच घडलेले आहेत का? माणसाच्या आजूबाजूलाही काही अर्थपूर्ण आणि देखणे बदल होत आहे. कुटुंब, समाज यातही काही सकारात्मक बदल घडत आहेत. कधी नव्हे तो एवढा माणूस आज परिवारासोबत, सदस्यांसोबत थांबतो आहे. प्रेमळ , आपुलकीच्या, विश्वासाच्या चर्चा झडत आहे. काही अपवाद वगळता, समाजातील उणीदुणी , भांडण, माऱ्यामाऱ्या, बलात्कार, खून, दरोडे, दंगे नि कोर्टकचेऱ्या काही कालावधीसाठी का होईना, थांबल्या आहेत. भालाईचा संसर्ग झालेली काही एकटी, दुकटी माणसं अजूनही अडचणीत असलेल्यांसाठी धावून जात आहेत. जीवजंतू, रोगाराईच्या साथी माणसाच्या अस्तित्वावर कधी ना कधी प्रश्न चिन्ह उभं करतीलच! त्याला नष्ट करणाच्या कायम टोकापर्यंत घेऊन जातील. तो नसला तरी कोणाचाच काही अडत नाही हे युगसत्य बदलायचं असेल तर माणसानं या क्षणापासूनच पूर्णांशान बदलायला सुरुवात केली पाहिजे.
👍correct
ReplyDeleteRight,👍😎...... & Mssttt lihila ahes......,👌👌
ReplyDeleteTy ☺☺😊
ReplyDelete