भारतीय संस्कृतीत संत व गुरू परंपरा सर्वात श्रेष्ठ आहे.
आपण सर्वजण आहोत ते आपल्या आईबाबांमुळे. ते दोघेही आपले प्रथम गुरू आहेत. ते जन्मापासून ज्या प्रेमाने आपले लालन पालन करतात. सर्व प्राथमिक अवस्थेत मदत करतात. चालायला बोलायला शिकवतात. आई व बाबा दोघांचेही त्यात सारखेच योगदान असते. आई आणि बाबा आपल्या मुलांचे अहित कधीच करीत नाही. त्यामुळे या दोघांनाही सारखाच दर्जा असतो. मुलांना शिस्त, धाक, नकळत बाबांमुळेच असतो. आपला मुलगा/ मुलगी खूप यशस्वी व्हावी, याकिरता बाबा पण खूप कष्ट करतात. त्यांचे वागणे, सवयी, बोलणे, याचा नकळत मुलांवर परिणाम होत असतो. ते आपल्या मुलांसाठी रोल मॉडेलच असतात.
तर आई सारखे दैवत दुसरे या जगात नाही. आईबाबांचे ऋण आपण फेडूच शकत नाही. त्यामुळेच आपल्याकडून त्यांना अपेक्षित असलेली त्यांची स्वप्ने पूर्ण करणे ही त्यांच्याप्रती आपली गुरुदक्षिणा होय.
व्यक्तीच्या वयानुसार त्यांचे विश्व बदलते. समाजात वावर वाढतो. व्यवहार ज्ञान देणारे शिक्षक हे त्याचे गुरू होतात. आईबाबांनी आपल्या पंखांना बळ दिले असते मात्र उडण्याची क्षमता गुरुजी देत असतात. शाळेचे शिक्षक अनेक विषयांचे सखोल ज्ञान देतात. चांगला नागरिक घडवतात. याच शिक्षणांच्या आधारे समाजात आपण मानाचे स्थान प्राप्त करतो. आपण चुकल्यास शिक्षा करण्याचा त्यांचा अधिकार असतो. चांगले शिक्षक चांगलाच मार्ग दाखवतात. त्यांच्या उपदेशाचे पालन करून आपली योग्य प्रगती करणे हीच त्यांची गुरुदक्षिणा होय. जेवढे गुरू श्रेष्ठ तेवढा शिष्य श्रेष्ठ.
गुरू हा शब्द आदर्श, महत्तेचे, चारित्र्याचे, सद्गुणांचे, न्यायीपणाचे, चिकाटीचे, ज्ञानाचे, सत्याचे प्रतीक आहे. निसर्ग, पर्यावरण, पाणी, पृथ्वी, झाडे, पाने, फुले, वारा हेसुद्धा आपले उत्तम गुरू आहेत. एका बागेत अनेक प्रकारची फळे फुलांची झाडे गुण्यागोविंदाने जगतात. चांगले जे त्यांची उधळण ते करतात. ज्या पृथ्वी मातेच्या कुशीत आपण बागडतो, तिच्याकडू कितीतरी गोष्टी आपण शिकाव्यात. पृथ्वी सारखा मोठ्या मनाचा दुसरा गुरू कोणी नाही. तिला अस्वच्छ ठेऊन तिचा अपमान तरी करू नये. पर्यावरण रक्षण करणे ही निसर्गाला आपली गुरुदक्षिणा होय.
वाचाल तर वाचाल. आपल्या सर्वांगीण विकासाचे गुरू व साधन ग्रंथसंपदा होय. धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक सर्व ज्ञान आपण पुस्तकातून मिळवतो. पुस्तके वाचून जगात नाव कमावणारे असंख्य आहेत. समर्थ वाचा, शिवराय वाचा, सावरकर वाचा, साने गुरुजी वाचा.. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. अब्दुल कलाम, अशी अनेक उदाहरणे साक्षी आहेत. पुस्तकरूपी गुरुजवळ लीन झाल्यावर, ज्ञानाचा योग्य वापर करणे हीच गुरूदक्षिणा होय.
शेजारी हेसुद्धा आपल्या जीवनाला आकार देत असतात. उत्तम शेजारी मिळणे, ही माणुसकी शिकवणारी शाळाच असते. आपल्या सुखदुःखात नेहमी साथ देणारे शेजारी आपले गुरुच. जगण्याचा अर्थ, प्रेम करणे, संसाराचे उत्तम धडे देणे, दुसऱ्यांच्या चुका मोठ्या मनाने माफ करने हे सगळं आपण त्यांच्याकडून शिकत असतो.
रक्ताच्या नात्यापेक्षा कधी कधी मैत्रीचे नाते घट्ट ठरते. रक्ताची नाती जन्माने मिळतात, पण माणुसकीची नाती मनाने जुळतात.
खरंतर आपण जन्मभर विद्यार्थी असतो आणि म्हणून योग्य ती वाटचाल करणे हीच गुरुदक्षिणा..!!
Comments
Post a Comment