मानवी मन, त्यात उठवणाऱ्या भावना आणि अल्हादलेली सृष्टी खूप अनोखं रसायन आहे हे. कविमनाला उभारी देणारा हा पाऊस पावसाळ्यात कवींची झोळी भरून टाकतो. मनात दाटलेलं मळभ सरींसोबत कवी माळत असतो. पाऊस ही भावनाच कवी मनासाठी सुखदायी असते. एक अप्रतिम कवितेचा नजराना कवितेतून कवी पावसात मांडत असतो. पाऊस हा मनाला व्यक्त करणारा साधन आहे असही मनाला हरकत नाही. अंगभर थंडगार शिरशिरी आणणारा हा पाऊस मानवी मनाचे असंख्य कंगोरे उलगडत जातो.
*पाऊस म्हणजे चिखल सारा..
पाऊस म्हणजे मरगळ..
पाऊस म्हणजे गार वारा..
पाऊस म्हणजे हिरवळ..*
कवी सौमित्राच्या या ओळी ऐकल्या तर पाऊस अधिक समृद्ध असल्यासारखा वाटतो. आकाशातून थेट कोसळणाऱ्या पावसाचा येणाच्या सांगावा मिळतो, तेव्हा उभा नांगर धरून शेतकरीही सज्ज होतो. पावसाच्या वाटेवर शेतकऱ्यांच्या भविष्याची स्वप्ने टक लावून बसली असतात. शेताला हिरवा शालू नेसवायला, कपड्यांना चिखलात माखवायला, मातीत स्वतःला रंगवायला तो आसुसलेला असतो. पावसाचं रुसणं, फुगणं, कधीही येणं, न सांगताच जाणं हे सगळं तो अनुभवतो.
त्याच्या वेळेवर येण्यानं माती ओली झाली तर शेतकऱ्यांची आभाळभर स्वप्ने पुढे साकारतात. कोंब टवकारून पीक हाताच्या मुठीत येतं आणि मधेच दुष्काळ येऊन शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर घाला घालतो, पण तरीही तो पुन्हा पुन्हा पाऊस येण्याची वाट पाहतो. कधीतरी येणारा दुष्काळ तर कधी होणारी अतिवृष्टी यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात हा पाऊस भरभरून येतो आणि मनातला पाऊस डोळ्यातून झरझर झरतो. असा हा संततधार पडणारा पाऊस प्रत्येकाच्या मनात बरसत असतो. प्रत्येकाचा पाऊस मात्र निराळा असतो. कधी मन हेलावणारा असतो तर कधी मन सुखावणारा असतो. पाहुण्यासारखं त्याचं येणं जाणं असलं तरी मनाला भावणारा असतो. प्रत्येकाच्या मनात वेगळ्या हिरिरीनं दाटलेला असतो.
पाऊस म्हणजे अख्ख्या सृष्टीला वेड लावणारा अदभूत सोहळा. करकरीत उन्हाची लाही कमी झाली की वेध लागतात ते पावसाचे. काळ्या निळ्या ढगांची मैफील जमलेली असते. मन आल्हादुन देणारा निसर्गातला गारवा पावसाचे संकेत देतो. ऊन-पावसाचा सारखाच लपंडाव चाललेला असतो. कधीतरी मधेच मग हळुवारपणे किरणांची पखरण होते. निसर्गाला हळुवार स्पर्शून त्याचं येणं मनाला आणि धरतीला ओलाचिंब करून टाकतो.
ऋतूंच्या घरी हा पावसाळा जुनाच आहे पण तरिही नव्यानं भासणारा तो पाहुणा आहे. तो येण्या आधीच त्याच्या स्वागताची तयारी झाली असते. निसर्ग, प्राणिमात्र आणि मानवी मनाला भावणारा हा झिम्माड पाऊस प्रत्येकाच्या मनात वेगळा साठलेला असतो. साऱ्या निसर्गात हिरवळ दाटलेली असताना काळ्याभोर मेघांचा आभाळात खेळ चालू असताना अलगद अंगावर पडणारा हा पाऊस आपणास शहारून टाकतो. कित्येकांच्या आठवणी या पावसात नव्याने तरंगू लागतात.
रिमझिम रिमझिम पाऊसधारा..
अवचित हिरवाईत मोरपिसारा..
अबोल असलेला निसर्गही या पावसाने सुखावून जातॊ. सारी सृष्टी नव्याने जागी होते आणि तिला तिच्या कर्तेपणाची जाणीव होते. उन्हाच्या कळा सोसून पेटलेली सृष्टी बेधुंद कोसळणाऱ्या सरींसोबत कात टाकते आणि सृजन काळांतच सारी सृष्टी न्हाऊन निघते................
Comments
Post a Comment