मागच्या आठवड्यात आई आणि मी एका दादाला भेटले. अधून मधून कधी दुकानात हार घ्यायला येत असतो दरवेळी फार कमी बोलतो पण या वेळी जरा गप्पा जास्तच रंगल्या. त्यात आईने सहज विचारलं "कि काय करत आहे तू आता?" त्यावर तो म्हणाला, "स्पर्धा परीक्षा पुढच्या महिन्यात आहे, त्याच वेळी एमए प्रथम वर्षाची पण परीक्षा आहे. समजतच नाही काय करू ते? " प्रश्न लक्षात आला. तो होतकरू होता आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी जोमात सुरु होती.
आई म्हणाली तुला एक साधी गोष्ट सांगू का? ऐकशील न..आमच्या दोघांचाही "हो" ऐकल्यावर आईने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.
एकदा एक शेतकरी गावातील एका माणसाकडे गेला आणि त्याला म्हणाला, "समजतच नाही काय करावं ते? शेतात पऱ्हाटी पेरली होती मात्र त्यात एवढं तण उगवलं कि पऱ्हाटीच्याही वर गेलं..समजतच नाही काय करावं?" त्यावर त्या माणसाने उत्तर दिलं, "सोपं आहे, पऱ्हाटी उपटून टाक". शेतकरी ठणक्यात म्हणाला,"काहीही का काहीही सांगता! अशी कशी उपटून टाकणार." यावर तो माणूस म्हणाला, "अरे भल्या माणसा उत्तर तर तुझ्याच कडे आहे."
आईची गोष्ट ऐकून, दादाला पटकन कळलं आणि म्हणाला, "स्पर्धा परीक्षेची तयारी मी अधिक जोमाने करतो."
आम्ही बरेचदा निर्णय घेताना नेमके काय करावे, अशा गोंधळात असतो. त्यावेळी आपले जीवनातील प्राधान्य महत्वाचे ठरते. करिअर निवडतांनाही पालक-विद्यार्थी अशा गोंधळात सापडतात. ज्या क्षेत्रातील पदवी आहे त्याच क्षेत्रात करिअर केले पाहिजे हा विचार केला जातो. मात्र पदवी हा औपचारिक शिक्षणाचा भाग आहे, तर करिअर हे जीवनाचे ध्येय आहे. अनेक एमबीबीएस, एमडी किंवा आयआयटी झालेले तरुण आज यशस्वी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतांना दिसतात. इंजिनीरिंग पदवी केलेले यशस्वी उद्योजक म्हणून दिसतात. हीच बाब छंदा बाबतही असते. पण म्हणून करिअर छंदातच करावे असे नाही. छंद हा त्याचा व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे. एखादा करिअर मध्ये उत्तुंग यश गाठले तरी त्याला छंद जोपासता येतो. त्यामुळे प्राध्यानाचा पाठलाग एच यशाचे गमक आहे हे लक्षात घेणे गरजेचे ठरते.
जीवनात आर्थिक , कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक प्रतिष्ठा, मैत्री, ध्येय जीवनातील प्रगती हे साधारणतः प्राध्यान्यक्रम असू शकतात. मग अश्यावेळी या प्रगतीच्या आड येणाऱ्या वैयक्तिक दोषांना दूर सारता आले पाहिजे. आळस, बेशिस्त, नकारात्मकता, आणि बाह्य मोबाईलचा अतिरिक्त वापर, व्यसन हे सगळं जाणीवपूर्वक दूर करता येणे महत्वाचे आहे. मनोनिग्रह, जिद्द या शस्त्रांच्या बळावर आलेल्या संकटांना मात करण्याची शक्ती तरुणांमध्ये असते. मन आणि शरीराचा संघर्षही असाच, आपण एक निश्चय करतो "काहीही करून हे पुस्तक आज वाचून संपवायचेच" मन म्हणते, "अभ्यास कर तू केले पाहिजे". शरीर म्हणतं, "झोप लेका! उद्या बघू". मग मनाला शरण जायचं कि शरीराला .. हा प्राध्यानाचा प्रश्नच.
"To be or not to be that is the question" हा जीवनातील गोंधळाचा वैश्विक प्रश्न आहे. याचे उत्तर दडलेले आहे तुमच्या प्राधान्यक्रमात.!
Comments
Post a Comment