Skip to main content

आई बाबा आणि मी

सकाळच्या प्रहरी चिमण्यांची पिल्लं झाडावरती, जेव्हा सारखी चिवचिवाट करत होती तेव्हा आईला मी प्रश्न केला. "आई ही पिल्लं एवढी चिवचिवाट का करत आहे ग?" त्यावर आई म्हणाली, " त्यांचे आई-बाबा त्यांना सोडून गेलेत ना म्हणून". मी म्हणाली, "बाबा खरंच त्या पिल्लांचे आई-बाबा कुठे गेले असतील? आणि आपल्या पिलांना सोडून त्यांना जावं तरी कसं वाटलं असेल?". त्यावर बाबा म्हणाले, "जगण्याचा खरा अर्थ या पक्षांना उमगला म्हणून तर त्यांनी आकाशात उंच भरारी घेण्यासाठी या पिलांची साथ सोडली. माणसाप्रमाणे पक्षीही त्यांच्या पिलांसाठी उन्हा-तान्हात फिरत असतात. त्यांचं पोट भरावे म्हणून इकडे तिकडे अन्नाचा दाना शोधतात. आणि एकदा का पिलांच्या पंखांना बळ आलं कि ते त्याना उंच आकाशात फिरायला मोकळे करतात." त्यावर माझा दुसरा प्रश्न पुन्हा उभा, "मग आपल्या पिलांना सोडून जाताना त्यांना काळजी किंवा भीती नाही वाटली कि आपली पिल्लं आमच्याविना कसे जगतील ते?" त्यावर आई म्हणाली, "काळजी असेल ना, पण कधी कधी पिलांच्या भल्यासाठी माय-बपांना मन कठोर करावे लागतात." माझा प्रश्नांना मात्र सीमा नव्हती, "मग आई बाबा गेल्यानंतर त्या पिल्लांनी कोणाकडे बघून जगायचं?" त्यावर आई म्हणाली, "कोणीही पोरकं होत नसतं. हे जग एवढं सुंदर आहे या जगात मायेने -प्रेमाने साथ देणारी भरपूर जण मिळतात. त्यांच्या साहाय्याने हेही उंच भरारी घेतील." हे ऐकून चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आलं.

Comments

Post a Comment