५ जून जागतिक पर्यावरण दिन. नेमकी आज याच दिवशी वटपौर्णिमा आली आहे. हा चांगला योगायोग. वटपौर्णिमेला सौभाग्यवती महिला वडाच्या झाडाचे पूजन करीत त्याला प्रदक्षिणा करतात. आपल्या संस्कृतीत ही फार सुंदर परंपरा आहे. या परंपरेतील कथा काहीही असो पण आपले सर्व सण - समारंभ निसर्गाशी जवळीक साधण्याची शिकवण देणारे आहेत. आज त्याकडे डोळस पणे बघणे गरजेचे आहे. परंपरेप्रमाणे सुहासिनी सुंदर तयार होऊन वडाच्या झाडाजवळ एकत्र येतात. त्या झाडाच्या खोडाला दोरा गुंडाळतात. प्रदक्षिणा मारतात. वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात. त्यामागचा त्यांचा उद्देश एकाच की कुंकवाचा हाच धनी सात जन्मी लाभू दे. आज आहे त्या जोडीरासोबत एक जन्म काढायला जिथे ताण येतो तिथे सात जन्माचे काय घेऊन बसलात. पण आपलं सर्व परंपरेप्रमाणे चालले आहे. या परंपरेचा विचार केला तर लक्षात येईल की याचा संबंध थेट पर्यावरणाशी आहे. निसर्ग रक्षणासाठी या परंपरा आपल्या पूर्वजांनी जाणीवपूर्वक निर्माण केल्या आहेत.
वड, पिंपळ, कडुलिंब ही झाडे मोठ्या प्रमाणात प्राणवायू वतावरणात सोडतात. ही झाडे जगली तर सृष्टी जगेल. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने माणसाचे वयोमान वाढण्यास मदत होते. त्याकडे दुर्लक्ष केलं तर काय परिस्थिती होते हे आज आपण अनुभवत आहो. आम्ही पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच करोना, चक्रीवादळ, टोळधाड, पाणीटंचाई, जागतिक तापमान वाढ असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. पर्यावरण दिनी या विषयावर आपण चिंतन करू शकलो तर अधिक बरे होईल. आपल्या हातात अधिकाधिक झाडे लावणे, पाण्याचा जपून वापर आणि संवर्धन हे नक्कीच आहे. वटसावित्रेचे पूजन करताना प्रत्येक महिलेने एक वडाचे झाड लावत त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला पाहिजे. आता ऊन थोडे कमी झाले आहेत, पावसाळी वातावरण आहे. वटसावित्री आणि पर्यावरण दिन कृतीपूर्ण साजरा करण्याची ही पर्वणीच आहे. ज्यामुळे जिथे शक्य असेल तिथे वडाचे रोप लावा. वडवृक्षरोपणातून खरं वटसावित्री पूजन करा.
Comments
Post a Comment