दरवर्षी जेष्ठ पौर्णिमेला म्हणजे आमच्याकडील वटपौर्णिमेला तुझी जयंती असते. पंधराव्या शतकात तू जन्माला आलास, बालपणापासून तू हिंदु धर्माची आणि मुस्लिम धर्माची चिकित्सा करू लागला. हिंदू धर्माचे लोकं तुला नास्तिक म्हणू लागले आणि मुस्लिम धर्माचे लोकं तुला काफिर समजू लागलेत. तुझ्याबाबत अनेक चमत्कारिक गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्या, पण तू लोकांना साधं-सोपं जीवन जगण्याचं तत्वज्ञान सांगू पाहत होतास... लोकांनी एक ईश्वरवाद मानावा यासाठी झगडत होता. तुझा राम हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला राम होता, जो पुढे महात्मा गांधींनी सुद्धा स्वतःचा हृदयात साठवून ठेवला. पण हा तुझा एकेश्वरवाद समाजाला कळला नाही, लोक शेवटपर्यंत तू हिंदू की मुस्लिम यावरच चर्चा करत राहिले.
तू संतांची, धर्मपीठांची, पुरोहितशाहीची एवढी चिकित्सा केली की संपूर्ण पुरोहितशाहीच तुझ्या विरुद्ध उभी राहिली. तू रामाला गुरू मानलं पण दुसऱ्याला स्वतःच शिष्यत्व प्रदान करून फसविले नाही.
कबीरा तुझ्या विचारांचा प्रभाव हा संपूर्ण देशभर पसरला. पंधराव्या शतकात वैदिक धर्माच्या सर्व परंपरा नाकारणे म्हणजे गंमत नव्हती. वैदिकधर्म तत्वज्ञान, अल्ला आणि मुस्लिम कट्टरता वादाला विरोध करणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण हे करत असताना तू कोणाला चेला केला नाही, तू स्वतः मठ स्थापन केले नाही, तू स्वतःला धर्मगुरुही म्हणवून घेतले नाहीस. हिंदु आणि इस्लामी धर्ममार्तंडांच्या दोषांवर, विसंगतीवर आणि चरित्रहीनतेवर तू कडाडून हल्ला करत राहिलास. जात-पात, कुलाभिमान, धर्मभेद, कर्मकांड, रूढी, व्रतवैकल्पे यांच्याविरोधात तू सतत लढा देत राहिलास. राम व रहीम एकच हे तू समाजाला सांगितले. खऱ्या अर्थाने भक्तीमार्ग जपण्याचा तू प्रयत्न केला. शुद्ध चारित्र्य, निष्कामता, अनासक्ती आणि सात्विक राहणी, या गुणांचा सतत पुरस्कार केला, त्यामुळे संताचाही संत ठरला.
आमच्या महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर कबीरपंथी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला दुसरा गुरू म्हणून तुझ्याकडेच बोट दाखविले. पुढे अनेकांनी तुझा विचार महाराष्ट्राचा परंपरेत रुजवला. तुझा विचार तुकारामाच्या अभंगात दिसतो, तुझा विचार महात्मा फुले यांचा सत्यधर्मात दिसतो,गाडगेबाबांचे कार्य आणि कर्तृत्वातून दिसतो. तुझी धर्मचिकित्सा पुढे अनेकांनी अंगीकारली.
कबीरा तू नेहमी म्हणायचा ,
ऐसी बानी बोलिये,
मन का आपा खोय।
औरन को शितल करे,
आपौ शितल होय।
आमच्याकडे गाडगेबाबांनी तुझं तात्वज्ञान सध्या सोप्या लोकसंवादातून जन माणसांपर्यंत पोहोचवलं. धर्माच्या नावावर पसरवल्या जाणाऱ्या अंधश्रद्धेवर मुळापासून प्रहार केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तुला गुरू मानलं आणि तुझं सर्व तत्वज्ञान भारतीय संविधानात एकत्रित गुंफून संपूर्ण देशात जातीवाद, असमानता यांना थारा दिला नाही. 'आर्टिकल-१५' म्हणजे तुझेच तत्वज्ञान आहे. व्यक्ती प्रतिष्ठा न देता प्रत्येकाला मताचे स्वतंत्र दिले. मत मांडण्याचा अधिकार दिला.
कबीरा तू म्हणायचा ना, सर्व माणसे समान आहेत ते खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाने करून दाखवलं. कबीरा आजच्या तुझ्या जयंतीला आम्हाला खरं सांगावसं वाटते की, आम्ही फार मनापासून हादरलेले आहोत. कबीर हे नावही सहसा कोणी आपल्या मुलाचं ठेवत नाही. हिंदू कुटुंबात जर कोणी मुलाचे हमीद नाव ठेवले तर हजार प्रश्न विचारतात. इथल्या समाजव्यवस्थेने नावालाही धर्मानुसार विभाग करून टाकले आहेत कबीरा...!!!
Comments
Post a Comment