Skip to main content

मैत्री ही निसर्गाशी

दोन खोल्यांच्या एखादया छोटया घरकलात डोकावले तर आपल्याला काय आढळते? त्या छोट्याशा घरकुलातील सामानाच्या दाटीवाटीत एखाद-दुसरी कुंडी असतेच. दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत लोक मोठ्या संख्येने काश्मीरला, सिमल्याला जात असतात. या साऱ्या गोष्टी काय सांगतात? 'वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे' हे तुकारामांचे अनुभवाचे बोल सर्वांच्याच रक्तात भिनलेले आहेत. नाहीतरी माणूस तरी काय? निसर्गाचेच लेकरू ना! त्याला आपल्या इतर भावंडांविषयी ओढ असणारच. आजच्या या विज्ञानयुगात तो यंत्राच्या जंजाळात जितका जितका अडकतो तितके त्याचे मन अधिकाधिक निसर्गाकडे खेचले जाते. म्हणून तर यंत्राच्या जगात जगणारा माणूस वेळात वेळ काढून दोन दिवस तरी आपल्या खेड्यातील घराकडे धाव घेतो.
निसर्ग आणि मानव यांच्यातील ही मैत्री फार जुनी आहे. अगदी अनादिकालापासूनच निसर्ग हा माणसाचा सोबती आहे. आकाशातील बदलणारे रंग पाहून कवींच्या वाणीला भरती आली.
या निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहेत! तो त्याची भूक भागवितो. तहान शमवितो. मंद, मधुर झुळकींनी श्रमपरिहार करतो. सुगंधित फुलांनी त्याचे जीवन सुगंधित करतो. थकल्याभागलेल्याला सावली देतो. उन्हाचा त्रास झाला तर पाण्याचा वर्षाव करतो. घर, निवारा उभारण्यासाठी लाकूड देतो. वस्त्रासाठी कापूस देतो. अन्न शिजविण्यासाठी जळण देतो. या सोबत्याने माणसाला आधार दिला नाही, असा मानवाच्या जीवनात एकही क्षण नाही. पण याहूनही अधिक मोलाच्या गोष्टी हा मित्र आपल्या मानवमित्रासाठी करीत असतो. विशेष म्हणजे माणसाचा एकाकीपणा तो सुसह्य करतो, आणि आपल्या आचरणाने तो अनेक मौलिक गुणांची शिकवण मानवाला देतो.
स्वतः उन्हात उभे राहून दुसऱ्याला सावली, फळे, फुले देणारी झाडे माणसाला जणू सांगत असतात, “अरे दुसऱ्यासाठी जगण्यातच जगण्याचा खरा अर्थ आहे.” “आपल्याजवळ जे काही आहे ना ते दुसऱ्याला देत जा,' हे सांगतच सरिता सर्वांचे जीवन फूलवीत मार्गक्रमण करीत असते. आपल्या मनाला खोली किती असावी हे सागराचा अथांगपणा दाखविते. भव्यतेचे परिमाण काय हे उत्तुंग पर्वत सांगतात, क्षमाशीलता किती पराकोटीची असू शकते हे पृथ्वी सांगते. “अरे मित्रा, अडचणी-अपयश येणारच त्यावर मात करायची," हे जाळे विणण्यासाठी धडपडणारा कोळी आपल्याला सांगत असतो. “चिकाटी हवी, असाध्य ते साध्य करता येतं बघ!" हे आपल्याला झाडावर लागलेले भलेमोठे मधमाश्यांचे पोळे सांगत असते. दहाजणींच्या प्रयत्नांतून एवढा मोठा गव्हाचा दाणाही कोठारात नेता येतो ही सहकाराची शिकवण मुंग्या देतात.
निसर्ग पावलोपावली माणसाला शिकवीत असतो आणि माणूस चुकला तर हा सोबती त्याला टपल्याही मारतो. आपल्या कर्तृत्वाचा माणसाला गर्व झाला की हा मित्र त्याला चांगलाच धडा देतो. मग माणसाचे डोळे उघडतात व पुन्हा तो आपल्या या निसर्गसख्याची संगतसाथ शोधायला लागतो.!!

Comments

Popular posts from this blog

My Drawings✏😇

कला वाट पाहतांना एक सुंदरी.....😍 माझ्या स्वप्नातली एक सुंदर परी.....💗 पक्ष्यांची उंच भरारी...🐦🕊 माझी आई..💗   नयन...👁

प्रवासातील अनुभव (भाग 2)

प्रवासातील अनुभव (भाग 2) कितीतरी दिवसानंतर आपण फक्त काही दिवसांसाठी घरी🏠 जात असतो म्हणून माझी 🕋कॉलेजला परत येण्याची इच्छाच नव्हती. ओढ जरी घरचीच असली तरी मनाला आवरत 🙂कॉलेजला परत यावेच लागते. येतांना घडलेला एक प्रसंग..  नेहमीप्रमाणे आजही बाबा म्हणाले,"बेटा लवकर आटप आपण एक तास अगोदर पोहचायला हवं". मी म्हणाली,"बाबा आपण अर्धा तास अगोदर निघूया". बाबा काही मानले नाही शेवटी एक तास अगोदरच नागपूरच्या रेल्वे स्थानकावर 🚞आम्ही पोहोचलो.  तिकीट काढलं पण तरी एक तास वेळ होता 😶अजून ट्रेन यायला. माझे बाबापण दुसरं कोणी दिसलं कि त्यांच्याशीच गप्पा 😀आणि मी इथे कंटाळत 😔होती. माझं फक्त इकडे-तिकडे पहाणं👁, येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन कडे कंटाळलेल्या नजरेने😒 पहाणं बस हेच सुरु होतं. आणि त्यात स्टेशनवर वस्तू विकणाऱ्यांच्या आवाज👻.  त्यातलाच एक मुलगा 👦,कदाचित आठवीतल्या वयाच्या मुलाएवढाच असावा. जोरजोराने ओरडत होता 'पानी थंडा-थंडा पानी". मी मनात म्हटलं काय मुलगा आहे, कसले घाणेरडे कपडे आहे याचे, कसला दिसतो 😒आहे, कसला अनाडी आहे. जाऊ दे रे बाबा🙅, मी पण हे काय विचार करत बसल...