असंच एकदा सुख माझा घरी आलं,
मी त्याचं हसतमुखाने स्वागत केलं
कोपऱ्यात सामान ठेऊन म्हणालं, मुक्कामालाच आलोय...
सुखगमनाची वार्ता सगळीकडे पसरली,
त्याला भेटण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी,
आशीर्वादासाठी सर्वांचीच रांग लागली,
ओळखीचे आले, पाळखीचे आले,
शेजारी आले, पाजारी आले, नातं असणारे आले,
नातं सांगणारे आले, नातं गाजवणारे आले, नातं जपणारे आले,
नातं दुरावलेलेही आले, सर्वांना सुखाला भेटायचं होतं,
त्याला आपल्या घरी बोलवायचं होतं...
मी म्हणाली सुखाला, आलास बरं वाटलं,
सुख म्हणालं, बस एवढंच, आनंद नाही झाला?
मी म्हटलं, त्यात काय तू येणारच होता,
सुख म्हणालं, तुझं हेच मला आवडतं,
आलो म्हणून उन्माद नाही,
मला डोक्यात जाऊ देत नाहीस,
सुखासह काळ फार छान जात होता,
एक दिवस सुख म्हणाले,
आता जरा बाहेर फिरून येतो,
तुझ्या सोबतीला सावत्र बंधूला पाठवतो...
थोड्याच वेळात दाराची घंटी वाजली,
हसत दुःख दारात उभं होतं,
विचारलं आता येऊ का? मी दारातून बाजूला झाली,
म्हटलं ये आता आत, आता मात्र दुःख प्रसन्न हसलं,
हसून म्हणालं, खात्री होती तू आता ये म्हणशील याची,
दुःख आलं, खुर्चीवर टेकलं,
मी म्हणाली बस, दमला असशील...
ते म्हणालं, बरोबर ओळखलंस,
सर्वांचे टोमणे, तिरस्कारानचे बोलने, कशाला आलास,
तुला काही बोलावलं नव्हते वगैरे ऐकून पार शिणलो होतो...
मी म्हणाली, बरं झाला आलास ते,
तुझ्याविरुद्ध लढणाऱ्या पेशी फारच सुस्तावल्या होत्या,
त्यांना थोडा व्यायाम मिळेल,
दुःख आपले अस्तित्व दाखवत होते,
मी खंबीरपणे त्याचा सामना करत होती,
त्याच्या आगमनाचीही बातमी पसरली,
पण यावेळी भेटीला येणारे कमी झाले होते...
कोणाला वेळ नव्हता, कोणी फारच गडबडीत होते,
कोणाकडे पाहुणे आले होते, कोणाकडे यायचे होते,
कोणाला स्वतःच पाहुणे म्हणून जायचे होते,
येणाऱ्यांनी मात्र मदतीसाठी शस्त्रे, अस्त्रे आणली होती,
तर कोणी ब्रह्मस्र तयार ठेवले होते,
शेवटच्या क्षणी लागलं तर माग म्हणाले होते...
दुःख आघात करीत होतं, मी रक्तबंबाळ होत गेली,
तरीही प्राणपणाने, घट्ट पाय रोखून, त्याचा प्रतिकार करतच होती,
शेवटी दुःख म्हणाले, तू हार मान्य कर, मी आक्रमण मागे घेतो,
मी म्हणाली, ठीक आहे जशी तुझी मर्जी,
मी माझे रक्त पुसले, दुःखानेही त्याचा घाम पुसला,
दुःख म्हणाले, मजा आली तुझ्या वाटेला जाऊन,
मीही जरा ताजेतवानी झाली, अरे पहिल्याच आघातात,
गलितगात्र होऊन पळ काढणाऱ्यार्विरुद्ध आक्रमणात,
ती मजा नाही, ती तुझ्या विरुद्ध हरता हरता जिंकण्यात आहे,
मी म्हणाली, अरे तुही जीवनात सुखा इतकाच आवकश्यक आहेस,
तुझे स्थान मिठा एवढेच महत्वाचे आहे...
बचकभर घ्यायचे नाही, पण चिमूटभर विसरायचे नाही,
तू आहेस म्हणून तर सुखाची किंमत आम्हाला कळते...
धपाटा मारून दुःख म्हणाले, लबाड आहेस,
टपली मारून मी म्हणाली, तू तरी काय कमी आहेस,
मी म्हणाली, अधून-मधून येत जा, बरसू नको पण,
हलका शिडकावा मात्र करून जा...
आणि हात जोडून विनंती आहे, सतत हिंडता फिरता रहा,
एकाच ठिकाणी रेंगाळू नकॊस,
कोणाकडे कधी ठाण मांडून बसू नको,
बास, आता निघतो, दुःख म्हणाले,
मी त्याला, अच्छा, टाटा, बायबाय केले,
तेही, बेटी, सी यु अगेन म्हणून निघून गेले,
ते घराबाहेर पडताच बाहेर खोळंबलेले सुखं,
परत माझ्या घरात आले, परत माझ्या घरात आले...!!
खूप छान शब्दरचना असाच शब्दसंग्रह हवा आणि भविष्यात सुद्धा छान छान लेख नेशील हीच अपेक्षा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
ReplyDelete